27/05/2016
बटाटा लागवड तंत्र
बटाटा हा आडसाली ऊसात उत्तम आंतरपिक ठरतोय. आमच्या जवळबन येथील शेतकर्याने एकरी ७० क्विंटल उत्पन्न आंतरपिकात तर सलग लागवड क्षेत्रात ९० क्विंटल उत्पन्न घेतले आहे.
आंतरपिक घेतल्यास उसाच्या पूर्ण खर्चाचे उत्पन्न बटाटा काढून देतो. यात बेणे निवड, त्याचा दर कमी करुण खरेदी करने आणि विक्री करताना किमान ८-९ रुपये प्रति किलो दर मिळवने हे जमल्यास हे पीक उत्तम नफा देतो.त्याच्या लागवड बाबत सविस्तर:
बटाट्याचे पीक मूळचे शीत हवामानातील आहे. थंड हवामान बटाटावाढीस पोषक आहे. या पिकासाठी खालीलप्रमाणे हवामान आवश्यक असते.
*तापमान- बटाटा लागवडीच्या वेळी २२ ते २५ अंश सेल्सिअस.पीकवाढीच्या सुरवातीच्या ४५ दिवसांच्या काळात २० ते २२ अंश सेल्सिअस. बटाटे (कंद) व त्याच्या वाढीच्या काळात (लागवडीपासून ४५ ते ६० दिवसांचा काळ) १७ ते २० अंश सेल्सिअस. बटाटेवाढीच्या काळात (६० ते ९० दिवस) २० ते २५ अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते.
बटाटा पीकवाढीच्या कालावधीत तापमान जर ३६ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिल्यास बटाटे पोसणे जवळजवळ बंद होते. उच्च तापमानामुळे बटाटा पिकामध्ये श्वासोच्छ्वास वाढतो आणि प्रकाश संश्लेषणासाठी लागणारे पिष्टमय पदार्थ हे तयार झालेल्या बटाट्यातून घेतले जातात. झाडे पसरण्याऐवजी सरळ उंच वाढतात, पाने कोमेजतात, तसेच कंद निमुळते वाढतात आणि बटाटे तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात.
*आर्द्रता - बटाटा पीकवाढीच्या अवस्थेत ६५ ते ८० टक्के
*सूर्यप्रकाशाचे तास - १० तास प्रति दिवस
- बटाट्याच्या शाखीय वाढीच्या काळात दिवस मोठा व रात्र लहान असणे व बटाटे पोसण्याच्या काळात दिवस लहान व रात्र मोठी असणे आवश्यक आहे.
*
लागवड कालावधी - जून अखेर ते जुलैचा पहिला आठवडा.
*जमीन -
- चांगली निचऱ्याची, भुसभुशीत, कसदार व चांगले सेंद्रिय घटक असणारी मध्यम प्रतीची जमीन निवडावी. जमिनीचा सामू ५ ते ६.५ च्या दरम्यान असावा. रेतियुक्त पोयट्याची जमीन या पिकास फायदेशीर आहे. जर सामू ६.५ च्या खाली असेल तर जमिनीतील स्फुरद, मॅग्नेशियम आणि कॅल्शिअम ही अन्नद्रव्ये झाडांना कमी प्रमाणात उपलब्ध होतात. जास्त आम्लधर्मी, तसेच चोपण जमिनीत लागवड केल्यास पोटॅटो स्कॅब हा रोग मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.
*बटाटा लागवडीच्या पद्धती -
१) सपाट वाफे पद्धत - या पद्धतीत पूर्वमशागतीनंतर ६० सें. मी. अंतरावर हलक्या सऱ्या पाडून घ्याव्यात. सऱ्यांमध्ये लागणारी रासायनिक खते देऊन नंतर बटाटे बेणे २० सें. मी. अंतरावर मातीने झाकून घ्यावेत. सर्व बेणे झाकून झाल्यानंतर उलट्या वखराच्या साह्याने सपाटीकरण करावे. जमिनीच्या उताराप्रमाणे योग्य आकाराचे वाफे तयार करून हलके पाणी द्यावे.
२) सुधारित सरी - वरंबा पद्धत - या पद्धतीत मार्करच्या साह्याने ६० सें. मी. अंतरावर रेषा ओढून त्यामध्ये शिफारशीप्रमाणे खतमात्रा द्यावी. त्या रेषेत २० सें. मी. अंतरावर बटाटे बेणे अंथरून घ्यावे. नंतर बैलाच्या रिझरने बटाटे बेणे वरंब्यात झाकून घ्यावे. लागवडीनंतर हलकेच पाणी द्यावे. ही पद्धत सोपी, कमी खर्चाची आहे.
३) रुंद गादी वाफा पद्धत - या सुधारित पद्धतीमध्ये तीन फूट रुंद वाफे तयार करून, त्यावर २ फूट अंतरावर बटाट्याची २ ओळींत लागवड केली जाते. प्रत्येक वाफ्यावर २ ओळींच्या मध्ये एक ठिबकची लॅटरल टाकली जाते. लागवडीनंतर पिकास ठिबक सिंचनाद्वारा पाणी, तसेच खते दिली जातात. या पद्धतीत बटाटा पिकाची वाढ जोमाने होते. रुंद गादी वाफा पद्धतीत ठिबक सिंचन पद्धतीबरोबरच तुषार सिंचन पद्धत ही फायदेशीर आहे.
४) यंत्राद्वारा बटाटा लागवड - केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र, लुधियाना यांनी विकसित केलेल्या ट्रॅक्टरचलित यंत्राच्या साह्याने बटाटे लागवड करता येते. त्याद्वारा बटाटा बेणे लागवड ६० सें. मी. अंतरावर होऊन सरी- वरंबे तयार होतात. लागवड कमी वेळ, मजूर व खर्चामध्ये पूर्ण होते.
महाराष्ट्र राज्यासाठी शिफारशित बटाटा वाण- कालावधी (दिवस)-उत्पादन (टन प्रति हेक्टरी)-वैशिष्ट्ये
कुफरी सूर्या-९० - १००-३०-३५-झाडे उंच जोमदार वाढणारी, बटाटे मध्यम आकर्षक लांबोळे, पांढऱ्या रंगाचे, डोळे उथळ आणि अंकुर लालसर जांभळ्या रंगाचे, ड्रायमॅटरचे प्रमाण जास्त, चिप्स, तसेच फ्रेंच फ्रायसाठी उपयुक्त, उच्च तापमानाला अनुकूल आणि रोगप्रतिकारक.
कुफरी पुखराज-९०-१००-३५-४०-झाड मध्यम ते जोमदार वाढणारे, बटाटे लांबोळे, फिकट पांढऱ्या रंगाचे व पिठूळ, डोळे मध्यम खोल, अंकुर जांभळ्या रंगाचे, फुले पांढरी, खरीप आणि रब्बी, दोन्ही हंगामांत चांगले उत्पन्न मिळते. लवकर येणाऱ्या करप्यास प्रतिकारक व उशिराच्या करप्यास मध्यम प्रतिकारक.
चिपसोना - १-७५-९०-३०-३५-झाड मध्यम उंच जोमदार वाढणारे, बटाटे मध्यम ते मोठ्या आकाराचे, डोळे उथळ आणि अंकुर पांढरट हिरवे असतात. ड्रायमॅटरचे प्रमाण जास्त, चिप्ससाठी उपयुक्त, उशिराच्या करप्यास प्रतिकारक.
चिपसोना - २-७५-९०-३०-३५-बटाटे गोल अंडाकृती, मध्यम आकाराचे आणि पांढरे असतात. डोळे उथळ असतात, अंकुर फिकट लाल पिवळसर असतात. ड्रायमॅटरचे प्रमाण जास्त, चिप्स, तसेच फ्रेंच फ्रायसाठी उपयुक्त, धुक्यास प्रतिकारक आणि उशिराच्या करप्यास प्रतिकारक.
चिपसोना ३-७५-९०-३०-३५-झाडे जोमदार वाढणारी, बटाटे मध्यम आकाराचे, पिवळसर रंगाचे आतून फिक्कट पांढरे, डोळे खोल आणि अंकुर लालसर जांभळ्या रंगाचे असतात. ड्रायमॅटरचे प्रमाण जास्त, चिप्स तसेच फ्रेंच फ्रायसाठी उपयुक्त आणि उशिराच्या करप्यास प्रतिकारक. साठवणुकीस उत्तम.
*बटाटा बियाणे निवड -
- बटाटा बेणे निरोगी, उत्तम दर्जाचे आणि भेसळमुक्त असावे.
- बेणे मध्यम आणि सारख्या आकाराचे असावे. मोठ्या आकाराच्या बेण्यामुळे बेण्यावरील खर्च वाढतो. लहान आकाराच्या बेण्यातून निघणारा कोंब कमकुवत राहून झाडांची वाढ योग्य होत नाही.
- लागवडीसाठी बेण्याचे वजन ३० ते ४० ग्रॅम असावे.
- बटाटा बेणे थंड हवामानात तयार झालेल्या बेण्यापासून अधिक उत्पादन मिळते.
- बटाटा बेणे पूर्ण पोसलेले, परिपक्व, चांगले मोड असलेले असावे. सामान्यपणे बेण्यावर एक सें. मी. आकाराचे जाड अंकुर असावेत. अंकुर अधिक लांब नसावेत. लागवडीवेळी मोडण्याची शक्यता असते.
- कोमेजलेले, तसेच सडलेले बटाटे काढून टाकावेत. बटाटा बेणे करपा आणि मर रोगांपासून मुक्त असावे.
- बेणे अपरिपक्व असल्यास उगवण नीट होत नाही, तर सुप्तावस्थेतील बेणे उशिरा उगवते. परिणामी, पीक तयार होण्याचा कालावधी वाढतो. बटाटा बेण्यावर डोळे नसल्यास ते वापरू नये.
*बीजप्रक्रिया -
- बटाटा बियाणे प्रक्रियेसाठी २५ ग्रॅम कार्बेन्डाझिम आणि इमिडाक्लोप्रिड (२०० एसएल) ४ मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ मिनिटे बटाटा बियाणे बुडवून घ्यावे.
- लागवडीपूर्वी २.५ किलो ॲझोटोबॅक्टर आणि ५०० मिलि द्रवरूप ॲसिटोबॅक्टर प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून २० क्विंटल बियाणे १५ मिनिटे बुडवून ठेवावे. त्यानंतर सदर बियाणे थंड, हवेशीर ठिकाणी पसरवून ठेवावे. त्यानंतर लागवड करावी.
भाजीपाल्याच्या वार्षिक उत्पादनात बटाट्याचे पीक अग्रस्थानी आहे. बटाटा पीक मुळचे दक्षिण अमेरिकेतील आहे. भारतामध्ये उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, पंजाब आणि आसाम या राज्यात बटाट्याची लागवड प्रामुख्याने होते. बटाट्याखालील एकूण क्षेत्रापैकी ८० टक्क्यापेक्षा अधिक क्षेत्र या पाच राज्यातील आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, बीड, औरंगाबाद आणि नागपूर जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
पोषक द्रव्ये व आहारातील महत्त्व : १०० ग्रॅम खाण्यायोग्य बटाट्यामध्ये खालील पोषक द्रव्ये उपलब्ध असतात.
पोषक द्रव्य : पाणी - ७४.७ ग्रॅम , प्रोटिन्स - १.६ ग्रॅम, सिन्ग्ध पदार्थ - ०.१ ग्रॅम , खनिजे - ०.६ ग्रॅम , तंतूमय पदार्थ - ०.४ ग्रॅम, कर्बोहायड्रेटस -२२.६ ग्रॅम , मॅग्नेशियम -२०० ग्रॅम, कॅल्शिअम -१०.०० ग्रॅम , ऑक्झॉंलिक आम्ल - २०.०० ग्रॅम , निकोटॉंनिक आम्ल - १.२ ग्रॅम , व्हिटॅमेन 'सी' -१७.०० ग्रॅम , फॉस्फरस - ४०.०० मि. ग्रॅम, लोह - ०.७ मि. ग्रॅम, सोडियम -११.०० मि. ग्रॅम पोटॅशियम - २४७.० मि. ग्रॅम, तांबे - ०.२० मि. ग्रॅम, गंधक -३७.० मि. ग्रॅम, क्लोरिन -१६.०० मि. ग्रॅम, रिबोक्लोव्हिन - ०.०१ मि. ग्रॅम, व्हिटॅमेन 'अ' -४०.०० आय. यू. कॅलरिज - ९७.०
महत्त्व : बटाट्यातील स्टार्चचा उपयोग कपड्यातील डाग घालविण्यासाठी करतात. बटाट्याच्या सालीच्या पाण्यात नवीन साडी भिजविल्यास रंग जात नाही व साडी, कपडे कडक राहतात. बटाट्याच्या फोडी करून चेहऱ्यास लावल्यास त्वचा मऊ राहते.
बटाटा हे कंदवर्गीय प्रमुख भाजीपाला पीक असून, आपल्या दररोजच्या आहारात प्रामुख्याने बटाट्याचा सर्रास वापर केला जातो. बटाट्यामध्ये जीवनसत्त्व 'ब' आणि ' क' भरपूर प्रमाणात असते. तसेच पिष्टमय पदार्थही भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे बटाटा हे शक्तीवर्धक पीक आहे. तसेच हे पीक कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारे पीक असून योग्य पद्धतीने हाताळल्यास अल्यावधीत अधिक पैसा मिळवून देणारे पीक आहे. तसेच गरिबांनाही बटाटा खाणे परवडते. त्यामुळे बटाट्याची गरज (मागणी) दिवसेंदिवस वाढतच आहे. परंतु उत्पादन अधिक झाल्यास महारष्ट्रामध्ये शीतगृहाची पुरेशी सोय नसल्यामुळे माल एकाच वेळी बाजारात येऊन भाव पडण्याची शक्यता असते. अशा वेळी सुलभ तंत्रज्ञानाचा उपयोग करून बटाट्याचे महत्त्व तसेच निरनिराळे प्रक्रिया पदार्थ यांचा सखोल अभ्यास करता सुशिक्षित बेरोजगारांच्या सतत भेडसावणाऱ्या समस्येवर मात करता येऊन बटाट्यापासून निरनिराळे प्रक्रिया प्रकल्प उभारून पैसा मिळविता येतो.
बटाटा हे पीक प्रामुख्याने उत्तर भारतात थंड हवामानाच्या ठिकाणी घेतले जाते. भारतामध्ये बटाटा लागवडीखालील क्षेत्र १३ लाख हेक्टर असून उत्पादन २३६ लाख टन आहे. देशाच्या मानाने महारष्ट्रात या पिकाखालील क्षेत्र फारच कमी १६०० हेक्टर एवढेच असून उत्पादनही कमी आहे.
महारष्ट्रामध्ये प्रामुख्याने पुणे, सातारा, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात लागवड केली जाते. खरीपातील उत्पादनाच्या मानाने रब्बी हंगामातील बटाटा उत्पादन अधिक येते. याचे प्रमुख कारण म्हणजे खरीप हंगामातील लागवड पावसावर अवलंबून असते. बहुतेक वेळा लागवड उशिरा होते. त्यामुळे उगवण कमी होते. अवेळी पडणाऱ्या पावसाने ताण दिल्यास अथवा प्रमाणापेक्षा जास्त पडल्यास पिकावर त्याचा अनिष्ट परिणाम होऊन उत्पादनात घट येते.
रब्बी हंगामात मात्र बटाटा लागवड करून पाण्याचे योग्य नियोजन केल्यास पिकाची जोमदार वाढ होते. तसेच थंडीमुळे पिकाची वाढ चांगली होते व उत्पादन अधिक येते. पावसाळी बटाट्याच्या तुलनेत रब्बी हंगामातील बटाटा निर्धोक असून त्यापासून अधिक उत्पादन हमखास मिळते.
महाराष्ट्र राज्याची सरासरी उत्पादकता एकरी ४० ते५० क्विंटल एवढी कमी आहे. त्यामुळे बटाट्याचे उत्पादन वाढविणे ही काळाची गरज आहे, यासाठी अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची निवड, योग्य लागवड पद्धत, आधुनिक तंत्रज्ञान डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार संतुलित वापर केल्यास उत्पादनात निश्चितच वाढ होते. याचे अनुभव खेड तालुक्यामध्ये तसेच सातारा, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतले आहेत.
बटाट्याच्या पाणी : महाराष्ट्रामध्ये कुपरी चंद्रमुखी कुपारी शिंदुरी, कुपरी ज्योती, कुपरी जवाहर या वाणांच्या लागवडीची शिफारस केली आहे. या वाणांचे वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
१) कुपरी चंद्रमुखी : या जातीची झाड मध्यम उंचीचे व जोमदार वाढणारे असते. भुमीगत खोड अखूड असते. बटाटे आकर्षक लांबोळे व मळकट पांढऱ्या रंगाचे असतात. गर मळकट पांढरा व पिठूळ असतो. या जातीचे बटाटे व्यवस्थित साठवता येतात. या जातीचा कालावधी ९० ते १०० दिवसांचा असून एकरी ८० ते ९० क्विंटल उत्पादन मिळते.
२) कुपरी शिंदुरी : या जातीचे झाड उंच व उभे वाढते. बटाटे मध्यम आकाराचे गोल व काळसर रंगाचे असतात. डोळे मध्यम खोल असतात. गर फिक्कट पिवळा, मेणचट असतो. फुले फिक्कट जांभळ्या रंगाची असतात. ही जात पाने मुरडणाऱ्या (लिफ कर्ल) रोगास प्रतिकारक आणि करपा (लेट ब्लाईट) या रोगाला मध्यम प्रतिकारक आहे.
या जातीचा कालावधी ११० ते १२० दिवसांचा असून उत्पादनास चांगली म्हणजे एकरी ९० ते १०० क्विंटल उत्पादन मिळते.
३) कुपरी ज्योती :हा संकरीत वाण अधिक उत्पादन देणारा व करपा रोगास प्रतिकारक आहे. या वाणाचे बटाटे मळकट पांढऱ्या रंगाचे व लांबोळे असतात. साठवणुकीत या बटाट्याची प्रत चांगली राहते. एकरी ८० ते ९० क्विंटल उत्पादन मिळते.
४) कुपरी जवाहर (जे. एच. २२२) : हा संकरीत वाण अधिक उत्पादन देणारा व करपा रोगाला प्रतिरोधक आहे. बटाटा मोठा ते मध्यम आकाराचा, लांबट गोल असून सालीचा रंग फिकट पांढुरका व चकचकीत असतो. महाराष्ट्रात या जातीचे उत्पादन चांगले मिळते.
५) पुखराज : ह्या वाणाचा बटाटा मोठा, कापताना आवाज न होणारा वेफर्ससाठी उत्तम असल्याने अधिक उत्पादन घेऊन वेफर्स कंपन्यांना माल विकण्यासाठी शेतकरी या वाणाचा वापर करू लागले आहेत. या वाणापासून उत्पादन, दर्जा चांगला मिळत असल्याने आर्थिकदृष्ट्या परवडत असल्याने ह्या वाणाचे लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे.
हवामान : महाराष्ट्रामध्ये अधिक पावसाचा प्रदेश वगळता अधिक उत्पादनाच्या दृष्टीने थंड हवामान बटाट्यास पोषक ठरते. साधारणपणे पीक वाढीच्या काळात दिवसाचे तापमान २१ डी. से. ग्रे. पेक्षा कमी असावे. बटाटे चांगले पोसण्यासाठी जमिनीचे तापमान १६ ते २० डी. सें.ग्रे. असावे. यापेक्षा जास्त तापमान असल्यास पिकाच्या वाढीवर अनिष्ठ परिणाम होऊन उत्पादनात घट येते. दिवसाचे तापमान ३२ अंश से. पेक्षा जास्त असल्यास बटाटे कमी लागतात.
खरीप हंगामासाठी १५ जून ते १५ जुलैच्या दरम्यान लागवड करावी. उशीरा लागवड झाल्यास उत्पादनात लाक्षणीय घट येते.
रब्बी हंगामात बटाटा लागवड १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या दरम्यान करावी. म्हणजे बटाटे पोसण्यासाठी डिसेंबर - जानेवारीतील थंड हवामान अनुकूल ठरते.
जमीन : बटाटा हे कंदमुळवर्गीय पीक असल्याने मध्यम, पाण्याच उत्तम निचरा होणारी, रेती किंवा पोयटायुक्त जमीन निवडावी. अशा जमिनीमध्ये बटाट्याचे चांगले पोषण होऊन रंग व आकार चांगला येतो. जमिनीचा सामू ५.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा. जास्त प्रमाणात क्षारता चोपण व पाणी साचून राहणाऱ्या जमिनी बटाट्यास अयोग्य आहेत.
पूर्व मशागत : उन्हाळी पीक काढल्यानंतर जमिनीची २५ ते ३० सें.मी. खोल नांगरट करून काही दिवस जमीन तापू द्यावी. नंतर कुळवाच्या एक ते दोन पाळ्या देऊन एकरी १२ ते १५ बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत आणि कल्पतरू सेंद्रिय खताच्या ५० किलोच्या २ बॅगा द्याव्यात. नंतर एक पाणी देऊन सऱ्या पाडाव्यात.
हिरवळीचे खत म्हणून जमिनीत ताग गाडणे हे रब्बी हंगामातील बटाट्याचे अधिक उत्पादन मिळण्याच्या दृष्टीने फायद्याचे आढळून आले आहे. तसेच सोयाबीन, भुईमूग किंवा बाजरी या पिकानंतर बटाट्याचे पीक घेतल्यास उत्पादन चांगले मिळून जमिनीचा पोतही कायम टिकून राहतो.
बेणे निवड : प्रमाणित केलेले कीड व रोगमुक्त बेणे निवडावे. सरकारी यंत्रणेकडून खात्रीशीर असे पायाभूत (फाऊंडेशन) वापरावे किंवा राष्ट्रीय बीज निगम (नॅशनल सिडस कापोरेशन) यांच्याकडून खरेदी करावे.
बटाटे पुर्ण वाढलेले व त्यावर अंकुर फुटलेले. ठेंगणे जाड व चांगले पोसलेले कोंब असावेत. अंधारातील जागेत चांगले वाढलेले कोंब लागणीनंतर वाळतात. शितगृहात बेणे ठेवलेले असल्यास ते लागणीपुर्वी ८ ते १० दिवस हवेशीर जागी, मंद प्रकाशात चांगले कोंब येण्यासाठी पसरवून ठेवावेत. साधारणपणे बटाटे २५ ते ३० ग्रॅम वजनाचे ५ सेंमी व्यासाचे संपूर्ण (न कापलेले) साधारणत: अंड्याच्या आकाराचे लागवडीसाठी वापरणे फायदेशीर ठरते. मोठ्या आकाराचे लागवडीसाठी वारपणे फायदेशीर ठरते. मोठ्या आकाराचे बेणे बटाटे असल्यास त्याच्या फोडी २५ ते ३० ग्रॅम वजनाच्या, त्यावर २ ते ३ डोळे राहतील अशा पद्धतीने फोडी कराव्यात. फोडी करत असताना विळा तसेच तेथील जागा जंतू विरहीत करणे फार महत्त्वाचे आहे. कापलेल्या फोडी १० ते १२ तास सुकवून नंतरच लागवड करावी.
बेणे प्रक्रिया : एकरी ८ ते १० क्विंटल बेणे पुरेशे होते. बेणे प्रक्रियेसाठी २०० लि. च्या बॅरलमध्ये १०० लि. पाणी घेऊन त्यामध्ये जर्मिनेटर १ लि. आणि प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम घेऊन त्या द्रावणामध्ये ५०० ते ७०० किलो पर्यंत बॅरलमध्ये बसेल या प्रमाणे थोडे थोडे ५ ते १० मिनीट भिजवून बाहेर काढून सुकवून लागवडीसाठी वापरावे.
बेणे ५०० ते ७०० किलोहून अधिक असल्यास त्याच बॅरलमधील द्रावणात पुढील प्रत्येकी ५०० किलो बेण्याच्या प्रक्रियेसाठी ५०० मिली जर्मिनेटर आणि २५० ग्रॅम प्रोटेक्टंटचा वापर करावा.
लागवडीची पद्धत : बटाटा लागवडीसाठी २ फुटाची सरी पडून त्यामध्ये १५ ते २० सेंमी अंतरावर बटाट्याची लागवड करावी आणि लगेच सारी फोडून घ्यावी. म्हणजे बटाट्याच्या खाप्यावर वरंबा व वरंब्याच्या ठिकाणी सरी तयार होईल. हिवाळ्यातील लागवड ही जमीन ओलावून वाफशावर करावी आणी उगवण झाल्यानंतर पाणी द्यावे.
खत व्यवस्थापन : बटाटा हे पीक खतास उत्तम प्रतिसाद देते. पालाशयुक्त खते वाढीस पोषक ठरतात. रासायनिक खतांचा वापर शक्यतो टाळावा. बटाट्याला जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करावा. कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर लागवडीपुर्वी एकरी १०० किलो आणि लागवडीनंतर पहिली खुरपणी झाल्यावर एकरी ५० किलो द्यावे.
आंतर मशागत : बटाटा पिकास लागवडीनंतर ४५ ते ५० दिवसांनी खांदणी करून भर द्यावी. कारण बटाटा उघडा पडल्यास सुर्यप्रकाशाने तो बटाटा हिरवा पडतो. सेलॅनीन या द्रव्यामुळे असा बटाटा खाण्यास निरूपयोगी ठरतो. कारण तो लवकर शिजत नाही आणि तो भाग कडसर लागतो. त्यामुळे अशा बटाट्याला बाजार भाव कमी मिळतो.
तसेच मातीची भर लावल्याने जमिनीत हवा खेळती राहिल्याने झाडांची वाढ जलद व चांगली होते. तसेच जमिनीखाली लागलेले लहान - लहान बटाटे पोसण्यास मदत होते.
पाणी व्यवस्थापन : बटाट्याची एकूण पाण्याची गरज ५० ते ६० सेंमी आहे. खरीपातील बटाट्याला पावसाळ्यात आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. तर रब्बी हंगामातील लागवड जमीन ओलावून वाफश्यावर केली असल्यास पहिले पाणी १० ते १५ दिवसांनी द्यावे. रब्बी हंगामामध्ये ८ ते १० दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. बटाट्याला एकूण ९ ते १० पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. बटाटे काढणीपूर्वी १० ते १२ दिवस पाणी तोडावे.
कीड व रोग : बटाटा उगवून आल्यानंतर मावा, तुडतुडे, देठ कुरतडणारी आळी या रसशोषणाच्या किडींचा प्रादुर्भाव होतो.
त्याचबरोबर बटाट्यामध्ये मर, करपा, तांबेरा, बांगडी (Ring Disease) या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
विकृती :
१) हिरवे बटाटे : उभ्या पिकातील बटाटे उघडे पडून त्यावर सुर्यप्रकाश व ऊन पडल्यामुळे हिरवा रंग येतो. असा बटाटा खाण्यास निरुपयोगी ठरतो.
२) हॅलो हार्ट : जादा खते व पाणी दिल्यास वाढ भरमसाठ होऊन या विकृतीचे प्रमाण आढळते. असा बटाटा आतून पोकळ राहतो व सडतो.
३) ब्लॅक हार्ट : काढणीनंतर साठवणीच्या वेळी बटाटा उन्हात राहिल्यास जास्त उष्णतेमुळे आतमध्ये काळसर पडत जातात. त्यामुळे बटाटा सावलीत ढीग करून ठेवावा.
वरील कीड, रोग, विकृतींवर प्रतिबंधक व प्रभावी उपाय तसेच भरघोस, दर्जेदार उत्पादनसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या खालीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.
फवारणी : १) पहिली फवारणी : (उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १०० मिली + स्प्लेंडर १०० मिली + १०० लि.पाणी.
२) दुसरी फवारणी : (उगवणीनंतर २५ ते ३० दिवसांनी) : जर्मिनेटर ३५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २०० मिली + स्प्लेंडर २५० मिली + १५० लि.पाणी.
३) तिसरी फवारणी : (उगवणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३०० मिली + स्प्लेंडर ३०० मिली + २०० लि.पाणी.
४) चौथी फवारणी : (उगवणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + न्युट्राटोन ७५० मिली. + हार्मोनी ५०० मिली + स्प्लेंडर ४०० मिली + २५० लि.पाणी.
काढणी : साधारणपणे बटाटे ९० ते १०० दिवसांत काढणीस येतात. काढणीपूर्वी बटाट्याची झाडे जमिनीलगत कापून घ्यावीत, ५ - ६ दिवसांनी बटाट्याची काढणी करावी. त्यामुळे बटाट्याची साल निघत नाही व वाहतुकीत बटाटा चांगला राहतो. बटाटा काढणीसाठी लाकडी नांगराचाही वापर करून मजुरांकडून तो वेचून घेतात. वेचलेले बटाटे स्वच्छ करून बाजारात विक्रीसाठी पाठवावेत. बटाटे बाजारात पाठविणे शक्य नसल्यास शितगृहात साठवावेत. काही शेतकरी, शितगृहाची सोय नसल्यास आरणीमध्ये साठवतात.
उत्पादन : एकरी १० ते १२ टन उत्पादन मिळते.
प्रक्रिया उद्योग : बटाट्याचे अधिक उत्पादन झाल्यास बटाट्यापासून निरनिराळे प्रक्रिया पदार्थ तयार करून विकणे फायद्याचे ठरते. हरियाणामध्ये अशा प्रकारचे उदा. वेफर्स उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत. आपल्या भागामध्येही राजगुरूनगर येथे वेफर्स. पापड, चिप्स, कीस तयार करण्याचे कुटीर उद्योग आहेत. ज्या मुली व महिलांनी चौथी ते आठवीतून अनेक कारणांनी शाळा सोडलेली आहे. अशांनी या निरनिराळ्या कुटीरोद्योगासाठी थोडेसे भांडवल गुंतवल्यास काही प्रमाणात आर्थिक प्रश्न सोडविता येणे शक्य आहे.